लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे स्वातंत्र्य अबादित रहावे- ना. सौ. शालिनीताई विखे ; कोपरगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा
शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी)- लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील वस्तुस्थिती मांडण्याचे पत्रकारांचे स्वातंत्र्य अबादित रहावे, असे मत जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे यांनी व्यक्त केले. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सार्वमचे संपादक अनंत पाटील यांना राज्यस्तरीय आर्दश पत्रकारीता तर पुण्यनगरीचे संस्थापक बाबा शिंगोटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यात सौ. विखे बोलत होत्या.
कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव व राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांना आदर्श पत्रकरिता पुरस्काराने तर पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. व्यासपीठावर पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूधचे अध्यक्ष राजेश परजणे, लोकमंथनचे संस्थापक संपादक अशोक सोनवणे, सभापती अनुसया होण, यशवंत पवार, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदि उपस्थित होते.
यावेळी ना. सौ. विखे म्हणाल्या, शेतकरी कुटुंबातील चौथी शिकलेले मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा जीवनप्रवास धक्क करणारा आहे. एक मराठी माणूस पेपर वाटता वाटता स्वतःच वर्तमान पत्र सुरू करतो, अन राज्यभर तो नावा रूपाला येतो. ही साधी गोष्ट नाही. यामागे मेहनत व अपार कष्ट आहेत. सार्वमतचे संपादक अनंत पाटील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. एरवी संपादकांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घ्यावी लागते मात्र अनंत पाटील हे सर्व सामन्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात. यातूनच त्यांचे वेगळेपण दिसून येते. ग्रामीण पत्रकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. महिलांचे, शेतकर्यांचे, तळागाळातील सर्वसामान्यांचे निगडीत प्रश्न त्यांच्या समस्या मांडण्याचे काम पत्रकार करत असतातच मात्र राजकीय पुढार्यांचा मी पणा व त्रुटी दाखविण्याचे काम वेळोवेळी पत्रकार करत असतात. कोणावरही अन्याय न करता पत्रकारांनी आपले काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सार्वमताचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी सार्वमतला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे वर्तमान पत्रावरील विश्वास टिकून आहे. अभ्यासपुर्ण माहिती मिळवुन ते वाचकांना उपलब्ध करून देत असल्याने सार्वमत वाचकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पत्रकारांच्या लिखाणाचा जनमानसावर चांगला/ वाईट परिणाम होतो. पत्रकारांचे लिखाण समाजाच्या हिताचे असले पाहिजे. काळाप्रमाणे समस्या निर्माण होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे. सरकारला जागृत ठेवण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यातून आम्हालाही खुप शिकायला मिळते. ग्रामीण भागातील समस्या पत्रकार मांडत असतात. अजूनही ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागाला पत्रकारितेतून न्याय देण्याचे काम ग्रामीण पत्रकारांनी करावे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही वृत्तपत्रांची विश्वासहर्यता टिकून आहे. विधानसभा व लोकसभेची संसद ठराविक वेळेतच चालू असते परंतु पत्रकारांची जनसंसद कायम स्वरूपी चालू असते.याचा उपयोग पत्रकार विविध समाज घटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यासाठी करत असतात. कोपरगाव तालुका पत्रकार भवनासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांनी प्रस्ताव पाठवा तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अश्वासन त्यांनी दिले.
सत्कारमुर्ती अनंत पाटील म्हणाले, समाजातला कचरा स्वच्छ करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करण्याचे काम पत्रकार करतात. मोठे स्वप्न ठेवले की, संशय येतो. परतू छोटेसे काम चांगले केले पाहिजे. आपले भवितव्य ग्रामीण भाग व संरचना याच्यावर अवलंबून आहे. नवनवीन घडवण्याचे काम होताना दिसत नाही. नवीन संकल्पनांना जन्म घालण्यासाठी आपले शब्द, कौशल्य, पत्रकारिता पणाला लावावी लागेल. आपण एका टप्यावर पोचल्यानंतर काय काम केले याचा विचार करायला हवा. जुने सोबत घेऊन नवीन काहीतरी करावे लागेल. नवा रोजगार, नवीन निर्मितीची गरज आहे. समाजातील सर्व वेगवेगळ्या विचार प्रवाहांचा विचार करून एक प्रवाह निर्माण केला पाहिजे. पुढील पन्नास वर्षांसाठी उत्तम काय आहे हे पाहून नियोजन करणे गरजेचे आहे. यात राजकारणाचा काहीही संबंध नाही. अशी स्थित्यंतरे नेहमी येत असतात. आधीच्या संघर्षाचे परिणाम भविष्य काळासाठी चांगलेच असतील.
दैनिक पुण्य नगरीचे संस्थापक संपादक मुरलीधरबाबा शिंगोटे यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे यांनी स्विकारला. ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीला त्याचे कार्य पाहून पुरस्कार दिला जातो.पुण्यनगरीचे संस्थापक बाबांचे काम निस्पृह आहे. त्यामुळे पुरस्कराची उंची वाढली आहे. या पुरस्कारामुळे पुण्यनगरी समूहाला बळ मिळाले आहे.
दैनिक लोकमंथनचे संस्थापक संपादक अशोक सोनवणे म्हणाले, ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत असतात त्याचप्रमाणे आमचे पत्रकार समाजामध्ये बारीक गोष्टींवर लक्ष ठेऊन समाजाच्या व्यथा मांडत असतात. कोपरगाव तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राजेश परजणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रकारिता हा चौथा स्तंभ नव्हे मुख्य स्तंभ आहे. सरकारने दुध दरात पाच रुपयांनी वाढ केली त्याबद्दल शासनाचे आभार. सरकारने शेतकर्यांना नागविण्याचे काम करू नये. याबाबद पत्रकारांनी जागृती करावी.
नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंतराव पवार म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला. परंतु केंद्र सरकारने त्रुटी असल्याने तो परत पाठवला आहे. पत्रकारांसाठी पंधरा कोटीचा निधी शासनाने आरक्षित केला. परंतु तो पुरेसा नाही तसेच माहिती व जनसंपर्क खाते छोट्या छोट्या दैनिकांना अनियमितता असल्याने नोटीसा पाठवत आहे. ही दैनिके बंद पडली तर ते रस्त्यावर येतील. अधिकार्यांनी हे बंद करावे.
यावेळी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड व कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आनंदवाडी येथील पूरग्रस्तांच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
पुरस्कार्थींना दिलेल्या सन्मान पत्राचे लेखन व वाचन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले.
यावेळी साकरवाडी येथील सोमैया विद्यामंदिरच्या प्राचार्या सुनिता पारे यांच्या सहकार्याने संगीत शिक्षक योगीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भागाजी वरखडे, नानासाहेब शेळके, शैलेश शिंदे, युसुफ रंगरेज, संतोष जाधव, सिद्धार्थ मेहेरखांब, सोमनाथ सोनपसारे, सचिन धर्मापुरीकर, रफिक रंगरेज, लक्ष्मण वावरे, रोहित टेके, प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. एस आर बखळे, लक्ष्मण जावळे, गोरक्षनाथ वर्पे, विजय शेळके, जनार्दन जगताप, फकीरा टेके, शिवाजी जाधव, संतोष देशमुख, नितीन जाधव, अक्षय खरात, दिलीप दुशिंग, हाफिज शेख, संजय लाड, योगेश डोखे, निवृत्ती शिंदे, पुंडलिक नवघरे, काकासाहेब खर्डे, मोबीन खान, राजेंद्र गाडे, संजय भवर, हेमचंद्र भवर, दत्तात्रय गायकवाड, अक्षय काळे, किरण नाईक, श्रीकांत नरोडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भागा वरखडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी तर आभार रोहित टेके यांनी मानले