Tuesday, 28 August 2018

रांजणगाव देशमुख येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन


शिर्डी लाईव्ह- प्रतिनिधी :-
                                पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच शेतकरी दिनाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही तालुक्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, पिकांवरील कीड नियंत्रण, तसेच कापसावरील बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, ग्रामविकास अधिकारी शेख, कृषी सहाय्यक किरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, चंद्रभान शिंदे, चंद्रभान गोर्डे, वीरेंद्र वर्पे, प्रकाश गोर्डे, हरिभाऊ गुडघे, अजित गुडघे, नितीन गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, सुनील गोर्डे, अरुण वर्पे, रावसाहेब ठोंबरे, भाऊसाहेब पवार आदि शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कपाशीच्या शेतात जाऊन कृषी सहाय्यक किरण शिंदे यांनी शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप लावण्याचे व बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले.



फोटो - कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 



Sunday, 26 August 2018

बहादरपुर मध्ये गोपाजी बाबांचा यात्रोत्सव सुरु ; विविध कार्यक्रमांचे आयोजन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर);-
                                कोपरगाव तालुक्यातील बहाद्दरपूर येथे दि. २६ पासून श्री संत सद्गुरू गोपाजी बाबांचा यात्रोत्सव सुरु झाला असून वर्षी रविवार दि २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत  यात्रोत्सव पार पडणार आहे. रविवार दि २६ रोजी  रोजी सायंकाळी  सदगुरु गोपाजी बाबांच्या रथाची भव्य मिरवणुक तसेच शोभेच्या दारूच्या आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी १० वाजता भव्य लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि २७ रोजी पहाटे ४ ते ६ बाबांच्या  समाधीचे पुजन व अभिषेक सोहळा तसेच सकाळी १० ते १२ भव्य गंगाजल कावड मिरवणुक व दुपारी २ ते ६ महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटूंचा कुस्त्यांचा हगामा असे कार्यक्रम होणार आहेत. परीसरातील भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन बहादरपुर यात्रा कमिटी व बहादरपुर ग्रामास्थांनी केले आहेत. बहाद्दरपूर येथे तळिक्यातून तसेच तालुक्याच्या बाहेरूनही गोपाजी बाबांचे भक्त दर्शनासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात. 

जीव आणि ब्रम्हाचे ऐक्य म्हणजे काला- ढोक महाराज


रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता
रांजणगाव देशमुख(वार्ताहर) :-
                                            देव, भक्त व नाम यांचे एकत्रीकरण आहे म्हणुन काला आहे. काला म्हणजे जिव आणी ब्रम्हाचे एेक्य आणी विकारहीत अंतकरण म्हणजे वाळवंट. सर्व काले वाळवंटातच झाले. असा काला फक्त महाराट्रातच आहे. स्वर्गातही असा काला नाही. असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात बोलत होते. ढोक महाराज पुढे म्हणाले की, ज्ञान, कर्म, योग हे मार्ग सामन्य माणसाला आचरणात आणणे आवघड आहे. त्यामधील सुक्ष्म चुक सुध्दा पापाला कारण होते.थोड्याशा भक्तीनेही शंकर प्रसन्न होतात. विष्णुभक्त श्रीमंत नसला तरी नामाने तारुण नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा मोठी आहे. त्यांचा राष्ट्रविकासातील वाटा अतिशय मोलाचा आहे. माणसाच्या जीवनातीच येरझार शांबवुन ईश्वराच्या रुपात विलीन होऊ शकतो. मानवी जिवनाचा उद्धार करण्यासाठी भक्तीसारखा सोपा मार्ग नाही.
                                 २०२० साली जोग महाराजांच्या शताब्दीनिमित्त रांजणगाव देशमुख येथे रामायाणासह मोठा सप्ताह करण्याचे यावेळी ढोक महाराज यांनी जाहीर केले. व त्या वर्षाची एक स्मरणीका काढणार असल्याचेही महाराजांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.स्नेहलता कोल्हे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे राजेंद्र विखे पाटील यांनी भेट दिली. युवकांनी खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान येथुन ज्योत आणली. महाप्रसादने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते. तरुणांनी महाप्रसाद वाढण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले होते.


...........................................
फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताह निमीत्त जमलेले भाविक व ढोक हाराज. (छाया-किशोर शिंदे)

Thursday, 16 August 2018

रांजणगाव देशमुख येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात ; लेझीम पथकाने वेधले लक्ष


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-

                          कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता गावातील जय हनुमान विद्यालयातील ध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली. भारत माता कि जय वंदे मातरम च्या जय घोषाने गाव दणाणून गेले होते. गावातील लहान थोरांमधील उत्साह अवर्णनीय होता. प्रभात फेरीनंतर गावातील ग्रामपंचायत व सोसायटीचे ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


                         यावेळी ग्रामविकास अधिकारी शेख, सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, पोलिस पाटिल राजेंद्र शेटे ग्रामपंचायत सदस्य, तलाठी जी पी कांगणे, मुख्याध्यापक अशोक दिघे सर, अमर बोगा, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्त मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन गवळी सर व कदम सर यांनी केले.


- यावेळी जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून मनोरा, मयूर, दहीहंडी अशा प्रकारात लेझीम नृत्य सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लेझीम पथकाला संजय वर्पे सर यांनी मार्गदर्शन केले.








फोटो - रांजणगाव देशमुख येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात जय हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून गावातून संचलन केले. 

Monday, 13 August 2018

पंचमीपासून रांजणगाव देशमुख येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाइव्ह, प्रतिनिधी:- 
                                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प बबन महाराज गव्हाणे व ह भ प अशोक महाराज क्षीरसागर अमरावती, बबन महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ ऑगस्ट ते  २३ ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे. 
                                     या सप्ताहात दि.१५ रोजी हभप माउली महाराज आळंदी, दि. १६ हभप दिगंबर महाराज किरकाडे दि. १७  हभप पांडुरंग महाराज गिरी दि. १८  हभप  विकास महाराज गायकवाड, दि. १९ हभप शिवाजी महाराज देशमुख, दि. २० हभप उद्धव महाराज मंडलिक, दि. २१ हभप अशोक महाराज क्षीरसागर, दि. २२ ह भ प रामराव महाराज ढोक व दि. २३ रोजी  ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहेत. सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २३ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. समारोपाच्या दिवशी काकडा पेटवण्यासाठी भद्रा मारोती खुलताबाद येथून दरवर्षी मशाल आणली जाते या मशालीचे हे १३ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


फोटो- श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान रांजणगाव देशमुख 

Tuesday, 7 August 2018

निळवंडेचे बंदिस्त कालवे अशक्य ; पारंपरिक व भूमीगत कालव्यातील तफावत अकराशे कोटींची



शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                         निळवंडे प्रकल्पाच्या अकोले तालुक्यातील कालव्यांबाबत अनेकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. मात्र यातील वास्तव वेगळे आहे. पारंपरिक कालवे व भूमीगत कालवे यातील फरक हा अंदाजे अकराशे कोटींचा असणार आहे. त्यामुळे ते सद्य स्थितीत कोणत्याही सरकारला परवाडणारे नाही. त्यामुळे याबाबत काही लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी या भूलथापांना व राजकीय घोषणांना बळी पडू नये असे आवाहन निळवंडे पाटपाणी कृती समीतीने केले आहे.

                         अकोले तालुक्यातील उजव्या कालव्यासाठी १ ते १८ कि. मी साठी फक्त ५६.६६ कोटी रूपये लागणार आहे. तेच बंदिस्त करण्यासाठी ३५० कोटी रूपये लागणार आहे. डाव्या कालव्यासाठी पारंपरिक पद्धतीने १३२.१७ कोटी लागणार आहे तो वाढून बंदिस्तसाठी ९८० कोटी रुपये अपेक्षित आहे. म्हणजे पारंपरिकसाठी अवघे १८८.८३ कोटी लागणार आहे. तर ते बंदिस्तसाठी १३३० कोटी रुपये लागणार आहे. म्हणजे दोन्हीतील फरक ११४१ कोटींचा आहे. एवढा वाढीव खर्च करणे कोणत्याही सरकारला परवडणारे किंवा ते व्यवहार्य नाही.

                        बंदिस्त कालव्यांबाबत शासनाचे धोरण नक्कीच आहे. संबधीत धोरणानुसार शासनाने २ फेब्रुवारी २०१८ रोजी एक जीआर काढला आहे. त्यानुसार ज्या प्रकल्पांचे पारंपरिक वितरण प्रणाली धरून भूसंपादन झालेले आहे अशा ठिकाणी नलिका वितरणाचा विचार करू नये असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. शासनाच्या मुख्य धोरणानुसार नलिका वितरण प्रणाली ही जमीन वाचवण्यासाठी नसून ते पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय बंदिस्त पाईपलाईन प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची जमीन वाचत नाही. जमीन तेवढीच लागते. कारण बंदिस्त पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्तीसाठी दोन्ही बाजूने रस्ते ठेवले जातात. त्यामुळे यातून जमीन वाचण्याची सुताराम शक्यता नाही. एकदा संपादीत केलेली जमीन शासन परत करत नाही किंवा तसा कायदा नाही. हे सर्व वास्तव सांगण्याचे धाडस एकही राजकीय नेता करत नाही. जे पूर्वी विधानसभेत पारंपरिक पध्दतीने कालवे झाले पाहिजे असे म्हणत होते ते आता बंदिस्त झाले पाहिजे असे म्हणत आहे. वास्तवस्थिती समजल्यावर मान्यवरांना देखील घुमजाव करण्याची वेळ येते. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांना या प्रसगांतून जावे लागले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही राज्याचे जलसंपदा प्रधान सचिव आय. एस. चहल यांना प्रवाही पद्धतीने कालव्यांची कामे करण्याचे आदेश द्यावे लागले. त्यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे सर्व वास्तव समजून घेऊन कालव्यांच्या कामाला विरोध करू नये असे आवाहन निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुखलाल गांगवे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, दादासाहेब पवार, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब रहाणे, सुखदेव खालकर, विठ्ठल घोरपडे, श्रीकांत मापारी यांनी केले आहे.



कालवा 
पारंपरिक खर्च (कोटीत )
बंदिस्त खर्च
(कोटीत ) 
दोन्हीतील  तफावत
( कोटीत )
उजवा कालवा
५६.६६
३५०
२९३.३४
डावा कालवा
१३२.१७
९८०
८४७.८३
एकुण खर्च
१८८.८३
१३३०
११४१.१७ 

Monday, 6 August 2018

निळवंडेच्या कालव्यांवर अकोल्यात जून अखेर ४८,२१७ लक्ष रुपयांचा खर्च

 निळवंडेच्या कालव्यांवर अकोल्यात जून अखेर  ४८,२१७ लक्ष रुपयांचा खर्च 



शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी)-
                                    उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ अवर्षण गावांना वरदान असणाऱ्या निळवंडे धरणावर सन २०१८-१९ मध्ये अकोले तालुक्यातील ६५ हजार ३८९ लक्ष ८७ हजार रुपयांच्या एकूण निविदेपैकी माहे जून अखेर ४८,२१७ लक्ष ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून प्रस्तावित कामासाठी ८ हजार ८९५ लक्ष १२ हजार रुपये प्रस्तावित असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समिती प्रकल्पच्या कालव्यांचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल यांनी  एका माहितीत दिली आहे. 

     उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता,  कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील १७६ गावांना तर सिन्नर तालुक्यातील ६ गावांसाठी निळवंडे धरण १९७० साली प्रस्तावित करण्यात आले. या गावांचे ६४ हजार २६० हेक्टरचे आठमाही सिंचन करण्यासाठी ८.३२ टी.एम.सी.चे धरण बांधून आता दहा वर्षाचा कालखंड लोटला आहे मात्र अद्याप या प्रकल्पाचे कालवे बांधण्यात आले नाही. वास्तविक  कुठल्याही धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण होण्याआधी किमान कालव्यांचे काम पाच वर्ष आधी पूर्ण होणे हा जलसंपदा विभागाच्या प्रकल्प उभारणी नियमानुसार अभिप्रेत असताना अप्पर प्रवरा २ अर्थात निळवंडे प्रकल्पाचा जल  सम्पदा विभागाने राजकीय खोड्यामुळे अपवाद करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पास आता ४९ वर्षे पूर्ण होत असतानाही या दुष्काळी शेतकऱ्यांना पिण्यासह शेती सिंचनाचे पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकरी आत आत्महत्या करण्यास प्रारंभ झाला आहे. या भागातील राजकीय पार्श्वभूमी लक्षातघेत हे कालवे पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नसल्याने या विरुद्ध निळवंडे  कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध लढा उभारला असून केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी वेगवर्धित सिंचन प्रकल्पात समावेश होण्यासाठी मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावून वकील अजित काळे यांच्या मार्फत सुप्रमा एस एफ सी व अखेरची  तांत्रिक मान्यता मिळविली आहे.

                                 राज्य सरकारची  गुंतवणूक मान्यता प्रस्तावास मान्यता मिळण्याचे काम अखेरच्या टप्प्प्यात आहे. तथापि विदर्भ मराठवाड्यातील १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील व उर्वरित महाराष्ट्रातील  दुष्काळ ग्रस्त भागातील बांधकामाची सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विशेष पॅकेज मधील १०७ प्रकल्पामध्ये निळवंडे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असुन या प्रकल्पास सन २०१८-१९ साठी १५८ कोटी ८३ लाख रुपयांची आर्थिक तरतुद या प्रकल्पात करण्यात आली आहे. तसेच नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधी मालिका अंतर्गत सण २०१८-१९ मध्ये उर्ध्व प्रवरा (निळवंडे -२ ) प्रकल्पावरील कालवे बांधकाम डावा कालवा किमी ० ते ३ व उजवा कालवा किमी ० ते ४० साठी रुपये १८९ कोटी ३५ लाख रुपयांना नागपूर येथील जलसंपदाचे मुख्य अभियंता यांनी ७ जुलै २०१८ रोजी मंजुरी प्रदान केली आहे. या वित्तीय वर्षात उपलब्ध निधीतून मुख्य कालवयांसाठी अकोले तालुक्यात जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केली आहे. आतापर्यंत उर्ध्व प्रवरा मुख्य डावा कालव्याचे काम ३३ टक्के पूर्ण झाले आहे. तर उजव्या कालव्याचे काम १९ % पूर्ण झाले आहे .

                                   उच्च स्तरीय  कालव्यांसह या प्रकल्पाची सिंचन क्षमता ६८ हजार ८७८ हेक्टर इतकी असून आता पर्यत २५६१ हेक्टर तेवढी सिंचन क्षमता  निर्माण झाल्याची माहिती रवींद्र बागुल यांनी निळवंडे कालवा कृती समितीस एक उत्तरात दिली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील १८२ गावात समाधानाचे वातावरण पसरले असले तरी अकोले तालुक्यातील भूसंपादन झालेले असल्याने आता कोणी यात जाणीवपूर्वक खोडा  घालू नये असे आवाहनही कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले ,नानासाहेब गाढवे, मच्छिन्द्र दिघे, संजय गुंजाळ, गंगाधर रहाणे, रमेश दिघे, दत्तात्रय आहेर, संदेश देशमुख, विठ्ठलराव देशमुख, नामदेव दिघे, बाबासाहेब गव्हाणे, माधवराव गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, सोमनाथ दरंदले , सुनील दिघे, अशोक गांडूळे, संतोष तारगे आदींनी केले आहे.

'निळवंडे' च्या कार्यवाहीबाबद १३ ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञा पत्र सादर करा ; औरंगाबाद खंडपीठाचे केंद्र सरकारला निर्देश

'निळवंडे' च्या कार्यवाहीबाबद १३ ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञा पत्र सादर करा
औरंगाबाद खंडपीठाचे केंद्र सरकारला निर्देश


शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी) :-
                                  गेली ४८ वर्षे रखडलेल्या व १८२ गावांसाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने  काय कार्यवाही केली याबाबाद १३ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च मुंबई उच्च न्यायालयाचे बेंच क्रमांक १ चे न्यायमूर्ती एस एस शिंदे व न्यायमूर्ती व्ही के जाधव यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
                                 त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे. निळवंडे धरणाची मंजुरी मिळून ४८ वर्षे उलटूनही अद्यापही हा प्रकल्प राज्य सरकारने पूर्ण केलेला नाही. धरणाच्या भिंतीचे काम होऊन १० वर्षांचा कालखंड उलटला तरी कालवे जलसंपदा विभागाने पूर्ण केलेले नाही. परिणाम स्वरूप उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ गावांतील शेती सिंचनापासून वंचित राहिली या गावांना अदयापही पिण्याचे पाणी मिळत नाही राज्य सरकारकडे अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी नसल्याने निळवंडे कालवा कृती समितीने सप्टेंबर २०१६ रोजी  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्रांत काले, नानासाहेब जवरे यांनी ऍड. अजित काळे यांच्यामार्फत जनहित याचिका क्रमांक पी आय एल १३३-२०१६ ने दाखल करून राज्य सरकारने रखडून ठेवलेली चौथी सुप्रमा, वित्त विभागाची हमी द्यावी, लाभ क्षेत्रातील गावांनाच प्रथम प्राधान्याने शेती सिंचनाचे व पिण्याचे पाणी मिळावे तसेच लाभक्षेत्रातील शहरांना पाणी देऊ नये अशा मागण्या या याचिकेद्वारे केल्या होत्या. त्यातील सुप्रमा व एस एफ सी राज्य सरकारने गत वर्षी न्यायालयाच्या आदेशामुळे दिल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाने गत महिन्यात तांत्रिक मान्यता दिल्याने १७ मान्यता या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. तथापि निधी मिळण्यात अद्याप राज्य सरकारकडून इन्व्हेन्समेंट क्लियरन्स प्रपोजल ही मान्यता प्रलंबित होती. त्यामुळे केंद्र सरकारडून २२३२.६७ कोटी रुपयांचा निधी मिळण्यात अडसर आला होता. याबाबाद औरंगाबाद खंडपीठात २७ जुलै रोजी न्या. एस एस शिंदे व न्या. व्ही के जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी कालवा कृती समितीच्या वतीने ऍड अजित काळे यांनी जोरदार दुष्काळी शेतकऱ्यांची बाजू मांडली. त्यावेळी  न्यायालयाने या प्रकल्पाची निधी मिळण्याबाबतची सद्य स्थिती काय आहे. हे पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सरकारचे वकील ऍड संजीव देशपांडे यांना दिले आहेत.
                            त्यावेळी कोपरगाव पालिकेने पाणी मिळण्यासाठी ऍड बिडगर यांच्यामार्फत प्रयत्न केला असता न्यायालयाने मूळ याचिका महत्वाची ठरवत पाणी आरक्षनाची जोपर्यंत गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ निर्णय घेत नाही तोपर्यंत बंधिस्त जलवाहिनी साठी पुढील कुठलीही कार्यवाही होऊ नये असे स्पष्टपणे बजावले आहे.

           यावेळी सुनावणीस निळवंडे कालवा कृती समितिचे पत्रकार नानासाहेब जवरे अध्यक्ष रुपेंद्र काले, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, नानासाहेब गाढवे, विलास भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निर्णयाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.